लढा कष्टकऱ्यांचा… साथ न्यायाची! धुलाई आंदोलनाला न्याय, भूमीपुत्र एल्गारचा विजय!



लढा कष्टकऱ्यांचा… साथ न्यायाची! धुलाई आंदोलनाला न्याय, भूमीपुत्र एल्गारचा विजय!
मुंबई / प्रसाद भालेराव
कष्टकरी महिलांच्या हक्कासाठी भूमीपुत्र एल्गार संघटनेने उभारलेल्या “धुलाई आंदोलनाला” विधीमंडळाच्या अधिवेशनात मोठे यश मिळाल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आंदोलनाचा बुलंद आवाज थेट विधिमंडळाच्या सभागृहात पोहोचवत, कष्टकरी महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. मनीषाताई कायंदे यांनी खंबीर पाठपुरावा केला.
डॉ. मनीषाताई कायंदे यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले असून, त्यांच्या पदरात न्याय पडल्याची भावना व्यक्त होत आहे. सर्वसामान्य कष्टकरी महिलांच्या व्यथा ओळखून एका लोकप्रतिनिधीने दिलेली ही साथ भूमीपुत्र एल्गार संघटनेसाठी अत्यंत मोलाची ठरली आहे.
या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज भूमीपुत्र एल्गार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानभवन परिसरात आमदार डॉ. मनीषाताई कायंदे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांना सदिच्छा भेट म्हणून ‘पुस्तक’ प्रदान करण्यात आले आणि संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी डॉ. मनीषाताई कायंदे यांनी संघटनेच्या जनहिताच्या लढ्याचे कौतुक करत, “जनहिताच्या प्रत्येक लढाईत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असा आश्वासक शब्द दिला. त्यांच्या या ठाम पाठिंब्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांना नव्या जोमाने आणि नव्या उर्जेने संघर्ष सुरू ठेवण्याचे बळ मिळाले आहे.
या प्रसंगी भूमीपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार, सरचिटणीस नवनाथ भोये, राज्य आदिम शक्ती प्रमुख स्वप्निल वाघ, तसेच विजय राऊत, अक्षय मुकणे आणि इतर सहकारी उपस्थित होते.
भूमीपुत्र एल्गार संघटनेच्या या लढ्यामुळे मिळालेला हा विजय केवळ एका संघटनेचा नसून, न्यायावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कष्टकरी आणि संघर्षशील नागरिकाचा विजय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.