सुरत ते नांदेड एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याची खा. डॉ. हेमंत सवरा यांच्याकडे मागणी.

सुरत ते नांदेड एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याची खा. डॉ. हेमंत सवरा यांच्याकडे मागणी*
पालघर (प्रतिनिधी) पालघर- मराठवाडा जिल्ह्यामधील व्यावसायिक , प्रशासकीय कर्मचारी वर्ग, औद्योगिक कर्मचारी, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी व रोजगारानिमित्त मुंबई पश्चिम भागातील बोरीवली, भाईंदर, वसई-विरार तसेच पालघर, बोईसर, डहाणू व गुजरातमधील वापी,वलसाड,सुरत या ठिकाणी बरेच लोक स्थायिक झालेले आहेत. सदर भागातून छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर ,हिंगोली, परभणी, नांदेड, धर्माबाद या भागात दळणवळणासाठी एकही रेल्वे गाडी नाही. त्यामुळे प्रवास करताना अनेक ठिकाणाहून रेल्वे गाड्या बदलत जोखमीचा प्रवास सदर भागातील प्रवाशांना करावा लागत आहे. तसेच वाढत्या प्रवाशांमुळे रेल्वेचे आरक्षण मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.
मुंबई पश्चिम भागातील ‘मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून दर्शन भंडारे यांनी नांदेड ते सुरत व सुरत ते नांदेड व्हाया कल्याण-वसईविरार, भिवंडी, कल्याण , मनमाड, छत्रपती संभाजी नगर मार्गे नांदेड अशी दैनंदिन धावणारी एक्सप्रेस रेल्वेगाडी सुरू करण्याबाबतच्या मागणीचे लेखी निवेदन पालघर लोकसभा सदस्य खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडे दिले आहे.
मराठवाड्यातून मुंबई पश्चिम भागात व गुजरातला ये-जा करणार्या प्रवाशांची वारंवारिता जास्त व रेल्वे गाड्यांची वारंवारिता कमी असल्याने प्रवास करण्याच्या चिंतेने प्रवासी जनता हैराण आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी नगर, नाशिक व मुंबईला यावे लागते. तसेच प्रशासकीय कर्मचारी, कापड व इतर व्यावसायिक, MIDC तील नोकरदार वर्ग तसेच रोजगाराच्या शोधातील चाकरमानी यांच्यासाठी एक्स्प्रेस रेल्वेगाडी सुरू झाल्यास अत्यंत सोईचे,सुरक्षित व सुखकर प्रवास होण्याची प्रवाशांची आशा आहे.