विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर मार्क्सवादी (लेनिनवादी) पक्षाचा धडक मोर्चा



विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर मार्क्सवादी (लेनिनवादी) पक्षाचा धडक मोर्चा
विक्रमगड/प्रसाद भालेराव
विक्रमगड तालुक्यात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सोमवार,दिनांक १० नोव्हेंबर रोजी माक्सवादी लेनिनवादी पक्षाने प्रचंड आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा धडकवला. हजारोंच्या संख्येने शेतकरी, कष्टकरी आणि आदिवासी बांधव लाल झेंडे हातात घेऊन तुफान घोषणा-बाजी देत तहसील कार्यालयावर एकच आक्रमण करत पोहोचले. दुपारी १ वाजता नगरपंचायत कार्यालय समोरून सुरुवात झालेला हा मोर्चा शिस्तबद्ध पण तितकाच तीव्र होता. तालुका सचिव कॉम्रेड.काशीनाथ कोकेरा, सहसचिव कॉम्रेड. प्रकाश भोई, कॉम्रेड. मिलका वरठे,कॉम्रेड.बंदेस वरठा, कॉम्रेड.रमेश धींडा आणि जिल्हा सहसचिव कॉम्रेड. शेरू वाघ यांनी प्रशासनाला खुलेआम इशारा देत सांगितले की, शेतकरी व आदिवासींच्या मागण्या पायदळी तुडवणाऱ्या अधिकाऱ्यांना आता जनतेचा कोप सहन करावा लागेल.
मोर्चादरम्यान लोकांनी तहसील कार्यालयाला चार तास घेरलं. त्या काळात “ओला दुष्काळ जाहीर करा, भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा द्या,शेतीमालाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोर्चात प्रामुख्याने शेतीमालाच्या नुकसानीची भरपाई, ओला दुष्काळ घोषणेची मागणी, आदिवासी भागांतील वीज आणि रस्त्यांचा प्रश्न, जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार,रास्तभाव धान्य दुकानदारांवरील नियंत्रण,तसेच रोजगार हमी योजनेची तात्काळ अंमलबजावणी या मागण्या ठळकपणे मांडण्यात आल्या.मोर्चा शांततेत पार पडला असला तरी त्यातील संताप स्पष्ट जाणवत होता. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तलवारीसारखा धारदार जनआक्रोश उसळेल, असा इशारा मार्क्सवादी (लेनिनवादी) पक्ष नेत्यांनी यावेळी दिला.