बोईसर येथील आरती फार्मालॅब्समध्ये किरकोळ रासायनिक घटना; २२ कामगार उपचाराधीन
बोईसर येथील आरती फार्मालॅब्समध्ये किरकोळ रासायनिक घटना; २२ कामगार उपचाराधीन
पालघर, (प्रतिनिधी)दि. २३ मार्च २०२६ — तारापूर एमआयडीसी परिसरातील मे. आरती फार्मालॅब्स लिमिटेड, बोईसर येथे २२ मार्च रोजी दुपारी सुमारे १:४५ वाजता किरकोळ रासायनिक घटना घडली. ही घटना डिस्पॅच विभागात टँकरमध्ये Di-Methyl Sulphate (DMS) रसायन भरताना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टँकरच्या वेंट लाईनमधून ओव्हरफ्लो होऊन अल्प प्रमाणात डीएमएस रसायन जमिनीवर सांडले. संबंधित ऑपरेटरने तत्काळ फिलिंग व्हॉल्व्ह बंद करून गळती नियंत्रणात आणली.
घटनेनंतर कारखान्याच्या सुरक्षा पथकाने तातडीने प्रतिसाद देत कामगारांना सुरक्षित स्थळी हलवले. सांडलेले रसायन लाईम व सोडा अॅशच्या साहाय्याने निष्क्रिय करण्यात आले असून ही प्रक्रिया दुपारी सुमारे २:३० वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली.
दरम्यान, डीएमएस रसायनाच्या वाफांमुळे काही सुरक्षा कर्मचारी व कामगारांना डोळ्यांत जळजळ जाणवली. सुरुवातीला त्यांना कारखान्यातच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले; मात्र सायंकाळी काहींचा त्रास कायम राहिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना बोईसर येथील लाइफलाईन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्व २२ कामगारांची प्रकृती स्थिर असून कोणताही जीवितधोका नाही. त्यांना प्रामुख्याने डोळ्यांत किरकोळ जळजळ (irritation) झाल्याचे निदर्शनास आले आहे.
उपचारासाठी दाखल कामगारांमध्ये नितेश ओझा, जितेश भोई, अक्षय पाटील, विकास कुमार, संतोष मुळे, समीर कुमार, सागर कुमार, निलेश शिर्डगे, पंकज गौतम, स्वप्निल तारे, ओंकार दांडेकर, अभिनव साहू, आशीष दुबे, मनोज राय, अजय पांडे, अमरचंद टांडी, अजय यादव, नितीन चौधरी, मिथिलेश झा, चुन्नू कुमार, अनिरुद्ध गुप्ता व हेमंत बडाणे यांचा समावेश आहे.
सदर घटना पूर्णतः नियंत्रणात असून परिसरात कोणताही धोका नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी दिली आहे. घटनेची सविस्तर चौकशी संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.