प्रबोधनकार ठाकरे विद्यालय, बोईसरचा २० वा वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.


प्रबोधनकार ठाकरे विद्यालय, बोईसरचा २० वा वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.
बोईसर (प्रतिनिधी) :- स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित प्रबोधनकार ठाकरे विद्यालय,बोईसरचा २० वा वार्षिक स्नेह संमेलन मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता टीमा मैदान, टाकी नाका, बोईसर (प.) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गिनी सिल्क मिल्स लिमिटेड, तारापूरचे महाव्यवस्थापक नीरज पुरोहित यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व विशद करत, “शिक्षणाशिवाय जीवन अपूर्ण आहे” असे मत व्यक्त केले. “शिक्षण म्हणजे सिंहिणीचे दूध आहे, जे ते पितो तोच गरजतो” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वचन आजही तितकेच लागू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यालयाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यानी आश्वासन दिले.कार्यक्रमात
विशेष अतिथी म्हणून उपस्थित सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष व एसईओ प्रशांत सातवी यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले व पर्यटनस्थळे दाखवून त्यांचे इतिहासज्ञान वाढविण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. नांदगावचे सरपंच व उद्योजक समीर मोरे यांनी पालकांच्या परिश्रमाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणा साठी पालकांनी केलेले कष्टांचे दृश्य व घामाचे महत्त्व पटवून देण्याची शाळा प्रशासनाला विनंती केली.
या कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. दर्शना राऊल, सरचिटणीस सौ. जागृती राऊल, वरिष्ठ पदाधिकारी सुरेश साहनी, सरावलीच्या माजी सरपंच सौ. लक्ष्मी चांदने, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन चांदने तसेच बोईसर–पालघर पत्रकार संघाचे अध्यक्ष रामप्रकाश निराला इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भगवान श्रीगणेश, सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्व. प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .या वेळी कु. मानसी राऊल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्या सौ. सुषमा भोसले यांनी प्रस्तावना मांडून शाळेच्या भावी योजनांची माहिती दिली. उपप्राचार्या सौ.कृषिका घरत यांनी वार्षिक अहवाल सादर केला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा व विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा पाटील व विद्यार्थ्यांनी केले. शेवटी स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी व पंचतत्व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊल यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करून उपस्थितांचे आभार मानले.