Uncategorized

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रम दिमाखात संपन्न

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात ‘शिवकल्याण राजा’ कार्यक्रम दिमाखात संपन्न

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला व वाणिज्य महिला स्वायत्त महाविद्यालय आणि श्री एम. पी. शाह कला व वाणिज्य कनिष्ठ महिला महाविद्यालय, माटुंगा येथील मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२६ उत्साहात साजरी करण्यात आली. ‘शिवकल्याण राजा’ या संकल्पनेवर आधारित विशेष सांगीतिक कार्यक्रमाने उपस्थितांना शिवचरित्राच्या तेजस्वी स्मृतींचा प्रेरणादायी अनुभव दिला.
बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी हा कार्यक्रम पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अपर्णा कासारे या विद्यार्थिनीने पहाडी आवाजात शिवगर्जना करत कार्यक्रमाची सुरुवात केली. गीतांजली पोळ हिने कणखर आवाजात अफजलखान वधाचा पोवाडा सादर केला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थिनींच्या सुमधुर समूहगीताने संपूर्ण वातावरण भारावून गेले.
या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायिका आणि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी अंजली नांदगावकर-तळेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी शिवरायांच्या शौर्य, धैर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे दर्शन घडविणारी निवडक गीते सादर केली. त्यांच्या प्रभावी आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह शिवमय झाले. प्रत्येक गीताला विद्यार्थिनींकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी अंजली नांदगावकर-तळेकर यांनी आपल्या जीवनप्रवासाबाबत मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाने घडवलेल्या संस्कारांचा उल्लेख करत त्यांनी आजीवन शिकण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की आणि उपप्राचार्या श्रीमती अल्पा दोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, ग्रंथपाल अश्विनी प्रभू, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन प्रा. नेहा भोसले यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. माधवी पवार यांनी करून दिला. डॉ. रश्मी शेटये तुपे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य आणि संस्कारांची जाणीव अधिक बळकट झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button