अजंदे येथे आरोग्य उपकेंद्र कायम बंद; उपकेंद्र गाई-म्हशींसाठी की माणसांसाठी?

अजंदे येथे आरोग्य उपकेंद्र कायम बंद; उपकेंद्र गाई-म्हशींसाठी की माणसांसाठी?
प्रतिनिधी / विशाल दांडगे
रावेर: ९ फेब्रुवारी २०२६
अजंदे येथे आरोग्य उपकेंद्र कायम बंद; उपकेंद्र गाई-म्हशींसाठी की माणसांसाठी?
रावेर;
जळगांव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील आजंदे येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या अनेक दिवसांपासून कायम बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उपकेंद्र अस्तित्वात असूनही प्रत्यक्षात ते निष्क्रिय असल्याने परिसरातील नागरिकांना उपचारासाठी पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील रावेर किंवा ऐनपूर येथे धाव घ्यावी लागत आहे.
अजंदे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेले हे उपकेंद्र केवळ लसीकरणाच्या दिवशीच उघडले जाते. इतर दिवशी अधिकारी व कर्मचारी येथे येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उपकेंद्रात निवासाची व्यवस्था असतानाही कोणताही कर्मचारी येथे वास्तव्यास तयार नाही. परिणामी, उपकेंद्र असूनही आरोग्य सेवा पूर्णतः ठप्प आहे.
पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था खराब असल्याने रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागतो. आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसून अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कोरोनानंतर नागरिक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले असून किरकोळ आजारासाठीही दवाखान्यात जाण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात खासगी व शासकीय रुग्णालयांची सुविधा उपलब्ध असताना ग्रामीण भागात मात्र हीच सुविधा नाही.
शासन आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत असले तरी त्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नसल्याने या सुविधा नेमक्या कोणासाठी, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट..
ग्रामीण भागात शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. याच संधीचा फायदा घेत पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेशसह इतर राज्यातील बोगस डॉक्टरांनी ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे रुग्णालये थाटल्याचे चित्र आहे.
वैद्यकीय शिक्षण व परवानगी नसतानाही उपचार सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येत आहे.
ओपीडी बंदच..
प्रत्येक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ओपीडी सुरू असणे बंधनकारक आहे. मात्र अजंदेसह अनेक ग्रामीण भागातील उपकेंद्रांमध्ये ओपीडी बंद असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय आरोग्य सेवा मिळत नसून त्यांना खाजगी रुग्णालयात जावे लागते आहे.
आजंदे ग्रामस्थांनी उपकेंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करून नियमित ओपीडी सुरू करण्याची मागणी केली आहे. तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी होत आहे.