जिल्हा परिषद पालघर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी


जिल्हा ही परिषद पालघर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
पालघर (प्रतिनिधी) :
जिल्हा परिषद पालघर येथे थोर स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र शिंदे यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय असून त्यांच्या निर्भीड व क्रांतिकारी नेतृत्वामुळे स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात सशस्त्र लढा उभारला. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा” या ऐतिहासिक घोषणेने देशातील तरुणाईला देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा दिली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. निर्भीड विचारमांडणी, प्रभावी नेतृत्व व समाजप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर खोलवर प्रभाव टाकला. त्यांच्या विचारांनी अनेक पिढ्यांना संघटन, स्वाभिमान व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा दिली.
अशा थोर महापुरुषांची जयंती जिल्हा परिषद पालघर येथे साजरी करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रकल्प संचालिका डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. इजाज अहमद शरीक मसलत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पं. अशोक पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) श्री. व्यंकटराव हुंडेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. सोमनाथ पिंजारी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.