ई-चलान वसुलीत गैरप्रकारांवर आळा; वाहनचालकांकडून रोख दंड न घेण्याचे स्पष्ट निर्देश

ई-चलान वसुलीत गैरप्रकारांवर आळा; वाहनचालकांकडून रोख दंड न घेण्याचे स्पष्ट निर्देश
मुंबई, (प्रतिनिधी)दि. ४ मार्च २०२६ – राज्यातील विविध वाहनचालक संघटनांच्या प्रतिनिधींनी परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर वाहन अडवून रोख स्वरूपात दंड वसूल केल्याच्या तक्रारी मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या कार्यालयातून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना याबाबत परिपत्रक पाठविण्यात आले आहे. त्यानुसार वाहनचालकांकडून ई-चलानच्या प्रलंबित दंडाची रक्कम रस्त्यावर थांबवून रोख स्वरूपात घेऊ नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
बैठकीत वाहनचालक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, वाहतूक पोलीस रस्त्यावर वाहन अडवून प्रलंबित ई-चलान दाखवून तात्काळ दंड भरण्याचा दबाव टाकतात. काही ठिकाणी रोख रक्कम घेण्याचे प्रकारही घडत असल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकारामुळे वाहनचालकांना त्रास होत असून पोलिसांच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या तक्रारींची दखल घेत परिवहन मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी केवळ नियमभंग झाल्यासच नियमानुसार कारवाई करावी. प्रलंबित ई-चलानसाठी रस्त्यावर वाहन थांबवून रोख दंड घेऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
तसेच वाहनचालकांना प्रलंबित ई-चलानची रक्कम अधिकृत ऑनलाइन प्रणालीद्वारे किंवा अधिकृत केंद्रांवर भरता येईल. या सूचनांचे पालन न करणाऱ्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.