बंधकामगार पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन–IJM यांच्यात सामंजस्य करारजिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली MoU वर स्वाक्षरी

बंधकामगार पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन–IJM यांच्यात सामंजस्य करार
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली MoU वर स्वाक्षरी
पालघर, दि. २ फेब्रुवारी :
बंधकामगार प्रथेला आळा घालून मुक्त करण्यात आलेल्या कामगारांचे सन्मानपूर्ण, सुरक्षित आणि शाश्वत पुनर्वसन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन (IJM) यांच्यात जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या सामंजस्य करारानुसार पालघर जिल्ह्यात मुक्त करण्यात आलेल्या बंधकामगारांच्या प्रभावी पुनर्वसनासाठी दोन्ही संस्था संयुक्तपणे कार्य करणार आहेत. पुनर्वसन प्रक्रियेला गती देताना रोजगारनिर्मिती, सामाजिक सुरक्षा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ, तसेच सन्मानपूर्ण जीवनमान उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
यासोबतच बंधकामगार प्रतिबंधक कायदे, त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि कार्यपद्धती याबाबत जिल्हा व क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांची संस्थात्मक क्षमता बळकट करण्यात येणार आहे. त्यामुळे बंधकामगार प्रकरणांची ओळख, सुटका, पुनर्वसन आणि पाठपुरावा या सर्व टप्प्यांमध्ये अधिक परिणामकारकता साध्य होणार आहे.
या सहकार्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे बंधकामगार प्रथेचे सखोल विश्लेषण आणि असुरक्षिततेचे नकाशीकरण (Vulnerability Mapping). यामुळे कोणत्या भागांमध्ये व कोणत्या समुदायांमध्ये बंधकामगार होण्याचा धोका अधिक आहे, हे स्पष्टपणे समोर येणार असून भविष्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहेत.
जिल्हा प्रशासन आणि IJM यांच्यात झालेला हा सामंजस्य करार सामाजिक न्याय, मानवाधिकार संरक्षण आणि समावेशक विकासाच्या दिशेने पालघर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.