अमली पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्या ३ आरोपींना पालघर पोलिसांकडून अटक२१.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमली पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्या ३ आरोपींना पालघर पोलिसांकडून अटक
२१.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
पालघर (प्रतिनिधी) :
पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्याच्या धोरणानुसार पालघर जिल्हा पोलीस दलाने मोठी कारवाई करत अमली पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व कासा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मौजे सोमटा गावातील इसम महेंद्र काशीनाथ गुरवाडा हा आपल्या घराशेजारील खोलीत प्रतिबंधित अमली पदार्थ साठवून ठेवत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला असता संबंधित ठिकाणाहून सुकेलेली अफूची बोंडे व त्यापासून तयार केलेली डोडा पावडर असा अमली पदार्थ आढळून आला. या कारवाईत एकूण १४३.५१ किलो वजनाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत रुपये २१,५२,६७५/- इतकी आहे.
या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), १८(ब), २५ व २९ प्रमाणे दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे :
महेंद्र काशीनाथ गुरवाडा, रा. सोमटा, ता. जि. पालघर
सुनील बियाराम बिष्णोई, रा. सोमटा, ता. जि. पालघर (जम्मू सरोवर हॉटेल)
बाबूलाल शिवशंकर यादव, रा. नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर
सर्व आरोपींना दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमर पाटील, कासा पोलीस ठाणे करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.