तलासरी येथील कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान शाखेची पालक-शिक्षक सभा संपन्न


तलासरी येथील कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान शाखेची पालक-शिक्षक सभा संपन्न
तलासरी (प्रतिनिधी)
दिनांक 25 फेब्रुवारी 2026
आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्ष विज्ञान (TYBSc) शाखेच्या विद्यार्थी आणि पालकांची विशेष सभा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. डॉ. मोहनभाई पटेल सभागृहात आयोजित या बैठकीत विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेची तयारी आणि भविष्यातील संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
उपप्राचार्य डॉ. वैभव माने यांनी स्वागतपर भाषणात महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध सुविधा तसेच विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील वर्तन यावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
परीक्षेसाठी आता अत्यंत कमी वेळ उरला असून विद्यार्थ्यांनी या काळात ‘पेटून’ उठून अभ्यासाला लागावे. गेलेली वेळ पुन्हा परत येणार नाही, त्यामुळे राहिलेल्या पेपर्समध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि मनोरंजनाच्या मोहात न पडता अभ्यासालाच आपले सर्वस्व मानावे. पालकांनीही या शेवटच्या टप्प्यात मुलांच्या आहाराची आणि अभ्यासाची जबाबदारी घेऊन त्यांना मानसिक बळ द्यावे, असे प्रतिपादन प्राचार्यांनी केले.
मोठी माणसे ही आपल्या ध्येयाने झपाटलेली असतात. विद्यार्थ्यांनी केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे भविष्य बदलण्यासाठी जिद्दीने अभ्यास करावा, असे प्रेरक आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीला विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. वैभव माने, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन राऊत, सहा. प्रा. बाळू लव्हारे, सहा. प्रा. शेफाली गहला, सहा. प्रा. हर्षाली दुबळा तसेच वसतिगृह अधीक्षक आस्मा पठाण आणि मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयाने राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे पालकांनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा व ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करावा, या सूचनेला सहमती दर्शवली.तसेच त्यांनी नैतिक मूल्य जोपासली पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. बाळू लव्हारे यांनी केले, तर सहा. प्रा. हर्षाली दुबळा यांनी आभार मानले. या सभेमुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत आत्मविश्वास वाढून पालक-शिक्षक समन्वय अधिक दृढ होण्यास मदत झाली.