छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ चा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शुभारंभजनतेच्या समस्या तात्काळ सोडविल्या जाणार.पालकमंत्री गणेश नाईक.




छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ चा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शुभारंभजनतेच्या समस्या तात्काळ सोडविल्या जाणार. पालकमंत्री गणेश नाईक.

पालघर,(प्रतिनिधी) दि. ७ मार्च : महसूल विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ चा शुभारंभ वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर तालुक्यातील माहिम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनतेच्या समस्या प्रशासनाने तत्काळ सोडवाव्यात आणि शासन-जनता यांच्यातील अंतर कमी करणे हीच या शिबिरामागची मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, सरपंच लोकप्रतिनिधी, तसेच नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की, शासनाचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी हे शिबिर अभियान सुरू करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील तालुका, मंडळ तसेच नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावर एकूण ५३ शिबिरे आयोजित केली जाणार असून ७ मार्चपासून सुरू झालेले हे अभियान १५ मेपर्यंत चालणार आहे.
माहिम गावाच्या ऐतिहासिक महत्त्वाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. पूर्वी माहिम हे पालघर परिसरातील प्रमुख व्यापारकेंद्र होते. येथील बंदरातून समुद्रमार्गे व्यापार होत असे. १९३६ साली येथे बाजारपेठ उभारली गेली होती, यावरून त्या काळातील गावाचे महत्त्व लक्षात येते, असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की, सातपाटी येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बंदर उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्यामुळे मच्छीमार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. भविष्यात पालघर जिल्हा हा “तिसऱ्या मुंबईचा जिल्हा” म्हणून विकसित होण्याची क्षमता बाळगतो. येथे विमानतळ, औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधा वाढत असताना स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.
विकास प्रकल्पांना स्थानिकांचा पाठिंबा मिळण्यासाठी त्यांना रोजगार, उद्योग आणि आर्थिक संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी लोकांच्या अडचणींचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
याशिवाय जिल्ह्यातील युवकांना उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपातळीवरून माहिती संकलित करून जिल्हा स्तरावर त्यांची छाननी करावी आणि योग्य त्या योजनांद्वारे कर्ज व मदत उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सूचित केले.
या अभियानामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होईल तसेच लोकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचून त्यांचे समाधान होईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे त्यांनी आभार मानले.
१५ मे रोजी या अभियानाची सांगता होणार असून त्यावेळी या मोहिमेचा सविस्तर अहवाल तयार करून राज्य शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले .