तलासरी येथील मुक्त विद्यापीठ केंद्रात ‘विद्यार्थी सुसंवाद व निरोप समारंभ’ उत्साहात संपन्न

तलासरी येथील मुक्त विद्यापीठ केंद्रात ‘विद्यार्थी सुसंवाद व निरोप समारंभ’ उत्साहात संपन्न


तलासरी दि. २९ (डॉ. दत्तात्रय शिंदे )
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तलासरी आयोजित ‘विद्यार्थी सुसंवाद मेळावा व निरोप समारंभ २०२५-२६’ नुकताच डॉ. मोहनभाई पटेल सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने आणि शिक्षणाचे महत्त्व यावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मुबंई विभागीय संचालक डॉ. वामन नाखले यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व विषद करतानाच, आधुनिक काळात AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि त्यातील शिक्षणाची भूमिका यावर प्रकाश टाकला. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, माणूस बनण्याचे धडे गिरवणे आवश्यक असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांतून पटवून दिले. सुहास सुरती यांनी महाविद्यालयीन जीवन आणि कॉ. परुळेकर यांच्या शैक्षणिक कार्यावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘अशक्य काहीच नाही’ असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला. महाविद्यालयातील सोयी-सुविधा वाढवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने होणारे प्रयत्न आणि मिळालेल्या शिक्षणाचा समाजाच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल, यावर त्यांनी विशेष भाष्य केले.कॉपीमुक्त परीक्षेला सामोरे जाण्याचा मोलाचा सल्ला देखील दिला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. भास्कर गोतीस यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली, ज्यामध्ये त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. दत्तात्रय शिंदे यांनी उपस्थितांना प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. नारायण तुवर यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी ठाकरे सर यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी केंद्रातील शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.