कॉपीमुक्त अभियानाबाबत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न.

कॉपीमुक्त अभियानाबाबत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न
पालघर (प्रतिनिधी):
कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक जिल्हाधिकारी तथा दक्षता समितीच्या अध्यक्ष मा. डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण विभाग (योजना), डायटचे प्राचार्य तसेच दक्षता समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर महसूल विभागामार्फत भरारी पथके नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या पथकांद्वारे अचानक तपासण्या करून गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की,
“सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून जबाबदारीने काम करावे. परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षण, सुरक्षा व्यवस्था तसेच अहवाल सादरीकरणाबाबत ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.”
तसेच, “कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येईल व आवश्यकतेनुसार अतिरिक्त उपाययोजना तात्काळ राबविण्यात येतील,” असेही त्यांनी नमूद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनीही कॉपीमुक्त अभियानाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की,
“शिक्षण विभागाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परीक्षा काळात नियोजित जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात. परीक्षा प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल.”
बैठकीत कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासन, महसूल व शिक्षण विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला.